शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

कितीकाळ दुटप्पीपणा चालू शकेल?

कितीकाळ दुटप्पीपणा चालू शकेल?



"In the End, we will remember not the words of our enemies, but the silence of our friends."  - Martin Luther King Jr.

अमेरिकेतील कृष्णवर्णियांचा लढा एकहाती लढलेले व त्यासाठी आत्मबलिदान करणारे नेते म्हणून मार्टीन ल्युथर किंग ओळखले जातात. त्यांनी शांततावादी व अहिंसक संघर्ष करून अमेरिकेत समता प्रस्थापित करण्याचा पराक्रम गाजवला आहे. असा माणूस काय म्हणतो? ‘शेवटी आमच्या लक्षात शत्रूचे शब्द असणार नाहीत, तर मित्रांचे मौन लक्षात राहिल.’ वरकरणी अतिशय सौम्य वाटणारे हे शब्द आहेत. पण वास्तवात हे किती स्फ़ोटक शब्द आहेत, त्याचा अंदाज करणेही अवघड आहे. जेव्हा लढाई होते आणि कडवा संघर्ष होतो, तेव्हा शत्रू ठाऊक असतो, कारण तो समोरच असतो. त्याचे गुन्हे आपल्याला ठाऊक असतात. म्हणूनच त्याचा बंदोबस्त वा निर्दालन करायला आपण नेहमीच सज्ज असतो. पण त्याने केलेल्या इजा जखमांची वेदना जितकी भेदक व यातनामय नसते, तितके मित्रांच्या दगाबाजीचे दु:ख सतावणारे असते. शत्रूला संपवता येते, पण मित्राची दगाबाजी म्हणजे मोक्याच्या क्षणी राखलेले मौन, कधीच भरून येत नाही अशी जखम असते. मार्टीन ल्युथर यांच्यासारखा अत्यंत सौम्य व शांत प्रवृत्तीचा माणुस इतके स्फ़ोटक बोलू शकतो? तर त्यातली वेदना लक्षात घेण्य़ाची गरज आहे. ल्युथरनी कोणाही विरोधात व्यक्त केलेला तो राग व द्वेष नाही, तर वास्तविक मानवी वृत्तीचा दिलेला इशारा आहे. माणूस जखमा व वेदना विसरू शकतो. पण विश्वासघात विसरू शकत नाही, असेच त्यांना समजवायचे आहे. आणि विश्वासघात म्हणजे मोक्याच्या क्षणी दिलेला दगा असतो. मैत्रीचे व विश्वासाचे नाटक करून ऐनवेळी पाठ फ़िरवण्याला दगा म्हणतात. संकट समोरून अंगावर येत असताना ते संकटच नाही, तर आभास असल्याचे आस्थापुर्वक सांगण्याला विश्वासघात म्हणतात. असा दगा विसरता येत नाही. अगदी शांततावादी मार्टीन ल्युथरही त्याचीच ग्वाही देतात. अमेरिकेतील ताज्या हत्याकांडाचे काय?

कालपरवा लोकमतच्या एका लेखात डुकराचे चित्र प्रसिद्ध झाल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यानी त्या वर्तमानपत्राचे अंक जाळले. कचेरीवर हल्ले केले. तर तो भावनेचा तितकाच धार्मिक आस्थेचा विषय असल्याचा बचाव मांडला गेला आहे. मुस्लिमांच्या धर्मप्रेमाविषयी किंवा धर्मवेडेपणाचा दाखला वेगळा देण्याची गरज नाही. युरोपात कुठे प्रेषिताचे व्यंगचित्र काढले, म्हणून इथलेही मुस्लिम रस्त्यावर येतात आणि जाळपोळ करतात. इशान्येला म्यानमार देशात मुस्लिमांवर हल्ले झाले, म्हणून इतले मुस्लिम रस्त्यावर येऊन हिंसा करतात. इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मुस्लिम मारले गेले, म्हणून मुस्लिमांच्या श्रद्धा दुखावल्या जातात. अशा प्रत्येक प्रसंगी आपल्या धर्माला धक्का लागला किंवा त्याची विटंबना झाली, म्हणूनच मुस्लिम रस्त्यावर आले व त्यांनी जमावाने हिंसा केली, हाच एकमेव बचाव असतो. युक्तीवाद म्हणून तो मान्य करू. कुठेही आणि केव्हाही इस्लामची विटंबना झाली, तरी मुस्लिम चवताळणार हा युक्तीवाद आहे. पण ठराविक निवडक वेळीच मुस्लिमांच्या भावना दुखावतात आणि इतर प्रसंगी इस्लामची कितीही अवहेलना झाली, तरी मुस्लिमांच्या भावना शांत रहाव्यात, अशी काही तरतुद आहे काय? कोणी इस्लामची विटंबना करावी आणि कोणी करू नये, असा काही नियम वा सुविधा आहे काय? नसेल तर कुठेही आणि केव्हाही इस्लामची अवहेलना झाली तरी तितकीच स्फ़ोटक व हिंसक प्रतिक्रीया मुस्लिमांकडून उमटली पाहिजे ना? पण तसा अनुभव येतो काय? इसिस वा अलकायदा नावाचे लोक जे काही इस्लामच्या नावाने करीत असतात, तो इस्लामचा गौरव आहे काय? तसे तर सांगायला कोणी मुस्लिम पुढे येत नाही. पण अशा घटना घडतात, तेव्हा इस्लामचा चुकीचा अर्थ लावून काही माथेफ़िरू मनमानी करतात असे सांगितले जाते.

लोकमत वा फ़्रान्सच्या कोणी चुकीचा अर्थ लावून काही केले तर तो भयंकर गुन्हा असतो आणि इसिस वा अलकायदा यांनी तसेच इस्लामचा गैर अर्थ लावून हिंसाचार केला तर तो गुन्हा नसतो काय? तेव्हाही इस्लामची विटंबनाच होत नाही काय? मग अशावेळी किती मुस्लिम वा त्यांच्या संघटना तितक्याच आवेशात रस्त्यावर येतात? म्यानमारमध्ये मुस्लिमांचे हत्याकांड झाले म्हणून रझा अकादमी मुंबईत जाळपोळ करते. पण तीच संस्था वा अन्य कुठली मुस्लिम संघटना इराक सिरीयामध्ये मुस्लिमांची कत्तल झाल्यावर किंचितही विचलीत होत नाही. कुठला मोर्चा काढत नाही, की घटनेचा निषेध करत नाही. मग त्या हिंसेचे ते मूक समर्थन नसते काय? सवाल सोपा आहे. मुस्लिमांच्या हत्याकांडाचा आवेग असतो, की त्याला मारणारा बिगर मुस्लिम असल्याचा आवेश असतो? इस्लामची विटंबना हा आस्थेचा विषय आहे की विटंबना कोणी केली यानुसार भावनांचा उद्रेक होत असतो? आपण अन्यधर्मियांशी गुण्यागोविंदाने नांदू शकतो व नांदतो, असे हवाले देणार्‍या ‘शांतताप्रिय’ मुस्लिम नागरिकांना याचे उत्तर शोधावे लागणार आहे. कारण दिवसेदिवस त्यांच्या वास्तविक भावना व त्याचे दिसणारे प्रदर्शन, यात मोठी तफ़ावत होत चालली आहे. अमेरिकेत एका शहरामध्ये पाकिस्तानी वंशाच्या एका मुस्लिम जोडप्याने अपंग सहाय्य करणार्‍या संस्थेत जावून बेछूट गोळीबार केला. त्यात पंधरा निरपराध मारले गेले. त्यानंतर प्रतिक्रीया देशाना तिथल्याच काही मुस्लिमांनी पहिली प्रतिक्रीया काय दिली? आता याचे दुष्परिणाम आम्हा स्थानिक मुस्लिमांना भोगावे लागतील. आमच्याकडे संशयाने बघितले जाईल. मुद्दा इतकाच, की पंधरा माणसे हकनाक मारली गेलीत आणि ज्यांनी मारली त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या भाऊबंदाविषयी संशय घेणेही गुन्हा ठरवला जातो आहे. ही भूमिकाच समस्या वाढवणारी आहे.

आपल्यातल्या एका मुस्लिमाने असे हिडीस हिंसक कृत्य केले, याची लाज वा खेद नाही. उलट त्यामुळे मरणार्‍यांच्या आप्तस्वकीयांना राग संताप येण्यावरच आक्षेप घेतला जात आहे. ही जगभरच्या मुस्लिमांची भूमिका व प्रवृत्ती त्यांना अधिकाधिक शंकास्पद बनवत चालली आहे. ज्यांनी कालपरवा लोकमत कार्यालयाची मोडतोड केली, त्यांनी इसिसने आपल्या कृत्यातून इस्लामची विटंबना चालविल्याच्या निषधार्थ काही केल्याचे आपल्या ऐकीवात वा़चनात आले आहे काय? नसेल तर मग अशा मुस्लिमांच्या धार्मिक आस्था शंकास्पद नाहीत काय? तस्लिमा नसरीनवर हल्ला करायला शिवशिवणारे हात, इसिसच्या बाबतीत थंड कसे पडतात? सलमान रश्दीला ठार मारायला उसळणार्‍या उर्मी, अलकायदाच्या उचापतींनंतर धर्माची प्रतिष्ठा राखायला पुढे कशाला येत नाहीत? धर्माचे पावित्र्य कोणी विटाळले, यानुसार भावना कार्यरत होतात किंवा सुप्तावस्थेत जातात, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? किंवा त्याचा दुसरा अर्थ असा असतो की इसिस वा अलकायदा यांनी जो ‘धर्मार्थ’ लावलेला आहे त्याच्याशी हे असे चवताळणारे सहमत असतात. म्हणूनच तेव्हा सुप्तावस्थेत जातात. याला बुद्धीमान पुरोगामी माना डोलवतात. पण सामान्य माणुस बुद्धीमंत वा पुरोगामी नसतो. सामान्य माणसाला तत्वज्ञान व विचारसरणीपेक्षा अनुभव शिकवत असतो. आणि जेव्हा अशा दुटप्पी अनुभवातून माणसे शिकतात, तेव्हा तारतम्याने निर्णय घेत असतात. थोडक्यात जगभरच्या मुस्लिमांसाठी आता कसोटीची वेळ जवळ येत चालली आहे. जिहादी इस्लाम की गुण्यागोविंदाने नांदवणारा इस्लाम, यातून निवड करावी लागणार आहे. नुसते प्रेमाचे, आपुलकीचे व शाब्दिक नाटक लोकांच्या अधिक काळ पचनी पडणार नाही. त्यातला मानभावीपणा जगाच्या नजरेत भरू लागला आहे. कसोटीच्या प्रसंगीचे मौन लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. म्हणूनच धर्मवेड चुचकारणारे पुरोगामी व त्यांच्या बळावर धर्मांधतेचा अतिरेक करणारे मुस्लिम नेते हेच आता जगभरच्या सामान्य मुस्लिमांचे घातक शत्रू होत चालले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा